माणदेश एक्सप्रेस न्युज : गडचिरोली : वैनगंगा नदीमध्ये नावेने प्रवास करीत असताना नाव उलटल्याने ६ महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२३) सकाळी ११ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै) गावानजीक घडली असून आतापर्यत दोन महिलांचे मृतदेह सापडले असून अन्य महिलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.
जीजाबाई दादाजी राऊत (५५), पुष्पा मुक्तेश्वर झाडे(४२), रेवंता हरिश्चंद्र झाडे(४२), मायाबाई अशोक राऊत(४५), सुषमा सचिन राऊत(२४), बुधाबाई देवाजी राऊत(६५) सर्व रा. गणपूर (रै) अशी मृतांची नावे आहेत. दुपारी जीजाबाई राऊत व पुष्पा झाडे या दोघींचे मृतदेह सापडले. यातील सारुबाई सुरेश कस्तुरे (वय ५०) या महिलेला वाचविण्यात नावाड्याला यश आले.
गणपूर (रै) गावापासून काही अंतरावर वैनगंगा नदी आहे. नदीपलीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्याची सीमा प्रारंभ होते. नेहमीप्रमाणे आज गणपूर येथील काही महिला दोन छोट्या नावेने वैनगंगा नदीतून प्रवास करुन पलिकडच्या शेतात मिरची तोडण्यासाठी जात होत्या. दोन्ही नाव एकापाठोपाठ होत्या. चिचडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने नदीपात्रात पाण्याची पातळीही वाढली आहे. शिवाय ढगाळ हवामान व वारा सुटल्याने नाव हेलकावे घेत होत्या.
काही क्षणातच दोन्ही नाव उलटल्याने सर्व महिला पाण्यात बुडाल्या. मागची नाव खडकाजवळ उलटल्याने तेथील महिला कशाबशा बाहेर पडल्या. मात्र, पुढे गेलेली नाव खोल पाण्यात उलटली. यात सहा महिला बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
(बातमी अपडेट होत आहे)