दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती दिली आहे.१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मे पूर्वी घेणं शक्य नाही, ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा-कॉलेज दिवाळीनंतर सुरु करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, त्यामुळे लवकरच यावर निर्णय होईल. दिवाळीनंतर शाळा-कॉलेज सुरु झाल्या तर मुलांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होणार नाही, विद्यार्थ्यांचे वर्ग सोशल डिस्टेंसिंगचं पालन करून, योग्य ती काळजी घेऊन सुरु करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने केली आहे. जर दिवाळीनंतर शाळा-कॉलेज सुरु झालं तरच मे महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा घेता येऊ शकतात असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार मे महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहे, कारण जर त्यापुढे परीक्षा गेल्या तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाळा सुरु होईल, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. त्यानंतर निकाल यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होऊ शकतो ते आम्हाला नको, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णयही शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये शाळा सुरु होणं गरजेचे आहे असं वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
त्याचसोबतच इयत्ता पहिली ते आठवी शाळा सुरु करण्याची कोणतीही घाई नाही, पहिल्या टप्प्यात ९ वी ते १२ वी शाळा सुरु केल्या जातील, बाकींच्याचे ऑनलाईन वर्ग सुरुच राहतील. शाळा सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. एकदा शाळा सुरु झाल्या तर पुन्हा बंद होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. आमच्यासाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता आहे. परंतु शैक्षणिक वर्षही वाया जाऊ नये याची तयारी केली जात आहे. दिल्ली, आंध्र प्रदेशात ज्याप्रकारे शाळा सुरु झाल्यानंतर कोरोना पसरला तसं होऊ नये यादृष्टीने पावलं उचलली जात आहेत असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज