नागपूर : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील शिवजयंती उत्सवात सहभागी झाले. यावेळी त्यांनी विज बील आणि शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारची थेट मुघलांशी तुलना केली आहे. राज्यात राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या कार्यक्रमावर सरकार बंदी आणत नाही. मात्र, शिवजयंती साजरी करताना सरकारकडून कलम 144 लावलं जातं अशी बोचरी टीका त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे.
फडणवीस पुढे म्हणाले, की आम्हाला छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जेव्हापर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तेव्हापर्यंत जयंती साजरी होत राहिल, असंही फडणवीसांनी म्हटलं. राज्यपालांच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी राज्य सरकारला संविधानाची आठवण करून दिली. फडणवीस म्हणाले, की ज्यांनी संविधान आणि महाराष्ट्र विधानसभेचे नियम वाचले नाही, तेच अध्यक्ष निवडीवरून राज्यपालांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करू शकतात.
फडणवीस म्हणाले, की संविधानात सांगितले आहे, अध्यक्ष निवडीची तारीख राज्यपालनं ठरवून गुप्त मतदान पद्धतीनं ती निवडणूक करावी. त्यामुळे माझा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सवाल आहे, की त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मान्य आहे की नाही? याशिवाय त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढीवरुनही राज्य सरकारला सुनवालं आहे. महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक टॅक्स कमी करत नाही.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस