सांगली : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शत प्रती शत ओबीसी उमेदवार देण्याची फडणवीसांनी काल घोषणा केलीय, त्यावर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी मंत्र्यांवर एकदम जळजळीत टीका केलीय.
पडळकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेते काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर झालंय. आणि ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय. जिथं ओबीसी मंत्र्यांच्याही शब्दाला मातीची किंमत नाहीये, तिथं सर्वसामान्य ओबीसींविषयी या प्रस्थापितांना किती आकस असेल. एकीकडे ओबीसी मंत्री म्हणतात “जो पर्यंत ओबीसी आरक्षण पुन्हा प्रस्थापित होणार नाही, तो पर्यंत आम्ही निवडणूक होऊ देणार नाही” पण दुसऱ्याच दिवशी निवडणूका जाहीर होतात. काय किंमत झालीये ओबीसी मंत्र्यांची? तुम्ही काय फक्त प्रस्थापितांना मुजरे घालण्यासाठी मंत्री झालात का? तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का? आता बास झालं. ओबीसी भटके विमुक्त बहुजन समाजाचा विश्वास घात करून निवडणूका घ्याल तर ओबीसी समाज दणका दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही ओबीसी बहुजनाच्या आक्रोशाची आग महाराष्ट्रभर पेटेल. आणि येत्या २६ तारखेला तुम्ही समस्त ओबीसी, भटके, बहुजन, अठरापगड बारा बलुतेदार समाजाची ताकद बघालच. तुमच्या गढ्यांना धक्का द्यायला आम्ही येतोय.
पुढे ते म्हणाले, ओबीसीं बांधवांसोबत दगाफटका करणाऱ्या आघाडी सरकारला मा. देवेंद्र फडणवीसांनी चोख उत्तर देत येणाऱ्या निवडणूकांमध्ये भाजपाच्या सर्वच जागांवर ओबीसी उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल समस्त ओबीसी बहुजन बांधवांतर्फे मी मा. फडणवीसांचे आभार मानतो. व मला विश्वास आहे या निर्णयाला समस्त बहुजन जनता साथ देईल असे पडळकर म्हणाले.