कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही महत्त्वाचं भाष्य केलं आहे. “आमदार प्रताप सरनाईक आणि परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्य सरकारवर कोणताच परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे”, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला.
हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. सरनाईक यांच्या पत्रकात दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेचे पदाधिकारी फोडले जात असल्याचा आरोप केला आहे, असा प्रश्न मुश्रीफ यांना विचारण्यात आला. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, “स्थानिक पातळीवर काही शिवसैनिक दोन्ही काँग्रेसमध्ये आले असतील. मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते फोडण्याचे प्रकार घडलेले नाही. उलट कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे सदस्य कमी असतानाही जिल्हा परिषदेत सर्वाधिक पदे दिली. गोकुळ दूध संघातही त्यांना स्थान दिले. दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतले आहे, ही बाब त्यांनी लक्षात घ्यावी. उभय काँग्रेसमध्ये मात्र एकमेकांचे कार्यकर्ते ओढून घेण्याचे सत्र कायमच सुरू असते,” असे ते म्हणाले.