सांगली : समाजातील सर्व घटकांनी काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांकडे विशेष लक्ष देवून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. विश्वास माने यांनी व्यक्त केले.
बालदिनाच्या निमित्ताने जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत वेलणकर बालकाश्रम सांगली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, बाल कल्याण समिती अध्यक्षा ॲड. सुचेता मलवाडे, ॲड. शोभा पाटील, शिवकुमारी ढवळे, ॲड. एम.एस. पखाली, सदस्य बाल न्याय मंडळ व अधिक्षीका अनुराधा डुबल आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दि. 20 नोव्हेंबर पर्यंत बालकांचे अधिकार संबंधित जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच न्या. नंदा घाटगे, बाल न्याय मंडळ व डॉ. जयश्री पाटील यांनी बाल दिनाचे औचित्य साधून बालकांना मार्गदर्शन केले व बालकांबाबत समाजाने जागृत असणे महत्वाचे असल्याचे सांगून बालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोहन सुर्यवंशी व सुषमा सुर्यवंशी यांनी बालगृहास संगणक संच भेट दिला.