महाराष्ट्र: भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, द काश्मीर फाईल्स चित्रपटावरूनही त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
“ नवरा, बायको, पाहुणे अशा बिरुदावल्या आमच्यातल्या सगळ्यांना ते देत आहेत, पण षंढाना काय बिरुदावली द्यायची? षंढ हे या कुठल्याच भूमिकेत नसतात. त्यामुळे त्यावर मी काही जास्त बोलत नाही.” असे जोरदार भाष्य जयंत पाटलांनी आज रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना केले आहे.
तसेच, सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. “महाविकास आघाडीचा संसार असा आहे, की यात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आहे. राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्याने काहीही मनमानी करावी, त्याला कुणी काही बोलत नाही. शिवसेना एका मुक्या बायकोसारखी आहे, जिला बोलता येत नाही. आणि काँग्रेसवाले वराती आहेत. ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती, पण ते बिन बुलाए जेवायला गेले आहेत. त्यांना लाज नाही. ते जेवायचे ताटही सोडत नाही. त्यांना हाणले तर खाली बसून जेवतील पण ते लग्नाचे फुकट जेवण सोडायला तयार नाहीत. नवरा मस्त मजा करत आहे. ही मूक बायको, तिला झालेला त्रास सहन करायचा आहे. सवत जर आणली तर माझे काय. म्हणून ते मूक बायकोच्या भूमिकेत आहेत.” असे ते म्हणाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर बोलताना जयंत पाटील यांनी, “चित्रपट येतात आणि जातात, पण प्रामुख्याने एखादा चित्रपट खांद्यावर घ्यावा, त्याचा प्रचार करावा आणि त्याचे मार्केटींग करावे हे सगले अनाकलनीय आहे. सात वर्षे सत्ता भोगूनही तुम्हाला काश्मीर फाईलच्या निर्मात्याच्या पायाशी का जावाव लागते?” असा जोरदार प्रश्नही जयंत पाटील यांनी मोदी सरकारला उद्देशून केला आहे.