नवी दिल्ली : सध्या असनी चक्रीवादळाचं संकट आले आहे. त्यामुळे आज ९ मे आणि उद्या १० मे रोजी काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळांचे तीव्र वादळात रुपांतर होईल. त्यानंतर येत्या ४८ तासांत हळुहळु तीव्रता कमी होईल, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
असनी चक्रीवादळ मंगळवारी उत्तर आंध्र-ओडिशा किनाऱ्यापासून उत्तर-पूर्वेकडे आणि लगतच्या वायव्य-पश्चिम दिशेच्या बंगालच्या उपसागराकडे वळून ओडिशाच्या किनाऱ्यापासून उत्तर-पश्चिमच्या बंगालच्या उपसागराकडे सरकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचे बुधवारी तीव्र चक्री वादळात रूपांतर होईल. त्यानंतर या वादळाची तीव्रता हळुहळु कमी होईल. पुढील ५ दिवसांत ईशान्य भारतात गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 आणि 12 मे दरम्यान अरुणाचल प्रदेशात आणि 09-12 मे दरम्यान आसाम-मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 08 ते 12 तारखेदरम्यान राजस्थानच्या विविध भागात उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात देखील आज पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पश्चिम मध्य प्रदेशात 9 ते 12 मे दरम्यान आणि दक्षिण हरियाणा, दिल्ली आणि दक्षिण पंजाबमध्ये 10 ते 12 मे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 10 तारखेच्या संध्याकाळपासून ओडिशा किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीच्या परिसरात हलकाते मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 मे रोजी ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे, असंही हवामान विभागानं म्हटले आहे.