बिहार : एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले. हे प्रकरण बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील विद्यापतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौ धनेशपूर दक्षिण गावातील आहे. आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मनोज झा ४२, सुंदर मणी ३८, सीता देवी ६५, सत्यम १० आणि शिवम ७ अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज हे पत्नी सुंदर मणी, आई सीता देवी आणि मुले सत्यम आणि शिवम यांच्यासह राहत होता. मनोजला दोन मुलीही आहेत, त्यापैकी एक मुलगी निभा पतीसोबत माहेरी आली होती. निभाने सांगितले की, ती आणि नवरा दुसऱ्या खोलीत झोपले होते.
सकाळी जाग आल्यावर शेजारील खोली उघडी दिसली. खोलीत डोकावून बघितले असता पाच जणांचे मृतदेह फासावर लटकलेले दिसले.मृतदेह पाहताच आरडाओरडा सुरू केली. यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले. एकाने लगेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळाजवळ लोकांची गर्दी जमली होती. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीने कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. मुलीच्या लग्नासाठीही मनोजने कर्ज घेतले होते. कुटुंबावर कर्जाचा ताण होता. त्यामुळे ते खूप अस्वस्थ होते. आर्थिक विवंचनेमुळे हे कुटुंब त्रस्त असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितल्याचे दलसिंगसरह एसपी हृदयकांत यांनी सांगितले.