नवी दिल्ली: देशात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 38 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, वाढत्या मृत्यूच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
याशिवाय, देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5 लाख 25 हजार 604 इतकी झाली आहे. सध्या भारतात कोरोनाचे 1 लाख 39 हजार 73 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण 0.32 टक्के आहे. तर देशातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 98.48 टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या 24 तासांत 16 हजार 994 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 45 हजार 350 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.
दरम्यान, मुंबईत सध्या 3318 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रात गुरुवारी दिवसभरात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.