मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेतले होते. या बैठकीत नामांतराचा निर्णयही घेण्यात आला होता. आता राज्यात नव्याने स्थापन झालेले शिंदे-फडणवीस सरकार या निर्णयाला स्थगिती दिली असल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे बहुमत कमी झाले होते. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र दिले होते. मात्र बहुमत सिद्ध करण्याअगोदरच उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्तावही बैठकीत मंजूर करण्यात आला होता.
दरम्यान, राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचे पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली आहे. हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.