यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील वैष्णवी राजू बागेश्वर हिला उपचारासाठी नागपुरात आणले. वैष्णवीची प्रकृती खालावत गेली. तातडीने तिला व्हेंटिलेटरची गरज होती. वैष्णवीचे आईवडील व्हेंटिलेटरच्या शोधात होते. पण वेळीच व्हेंटिलेटर न मिळाल्याने 17 वर्षांच्या वैष्णवीचा आईवडिलांसमोरच तडफडून मृत्यू झाला.दरम्यान, या घटनेने आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे की काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, वैष्णवी 17 वर्षांची तरुणी अस्वस्थ होती. तिच्यावर यवतमाळमध्ये उपचार सुरु होते. 14 तारखेच्या रात्री तिला यवतमाळमधून नागपुरात आणण्यात आले होते. तिला पोटाचा विकार होता. तीची प्रकृती अधिक खालावत चालली होती म्हणून डॉक्टरांनी वैष्णवीला नागपूरच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे तिला नागपुरात तिचे आईवडील घेऊन आले. पण नागपूरच्या मेडिकल कॉलेजात व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते.
दरम्यान, व्हेंटिलेटर मिळू न शकल्याने वैष्णवीचा तडफडून मृत्यू झाला, असा आरोप आता वैष्णवीच्या पालकांनी केला आहे.