सांगली: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा येथे लहान मुलांचे अपहरण करणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी आता सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमसिद्ध सरगर, लहू लोखंडे, नागराज पवार, रमेश कोळी, सचिन बिराजदार, सागर तांबे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील चार साधू कर्नाटकातील विजापूरहून पंढरपूर शहरात कारमधून जात होते. हे सर्व साधू सोमवारी जत येथील लवंगा गावातील एका मंदिरात थांबले होते. मंगळवारी सकाळी प्रवासाला सुरूवात करताना त्यांनी एका मुलाला रस्ता विचारला, त्यामुळे तेथील काही गावकऱ्यांना बालचोरांची टोळी असल्याचा संशय आला. यानंतर गावकऱ्यांनी या साधूंची चौकशी सुरू केली, त्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी साधूंना गाडीतून बाहेर काढले आणि मारहाण केली. त्यांना लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यात आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून याप्रकरणी ६ आरोपींना अटक केली.