सांगली - देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. तसेच, महाराष्ट्रात देखील हा रोग पसरू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर लम्पी आजारामुळे आता जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर सुरु करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तसेच, सांगली जिल्ह्यात आतापर्यंत ३८ जनावरांना लम्पीची लागण झाल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली. बाधित ३८ जनावरापैकी २० जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत २० हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून आत्तापर्यंत एकही जनावरांचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे.
दरम्यान, या रोगाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेत लेखी स्वरूपात माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माहिती लपविल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे. उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात यावेत. संसर्गित पशू मृत झाल्यास त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, नगर पंचायत, महापालिका यांच्यावर राहणार आहे. याच्या उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय रॅपिड ॲक्शन टीम तयार करण्यात आल्या आहेत.