जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन पीक हंगाम घेण्यात येतात. हे दोन्हीही हंगाम मोठ्या प्रमाणात घेतले जातात. खरीपाचे क्षेत्र ३ लाख हेक्टरपर्यंत राहते. तर रब्बीचे यंदा २ लाख हेक्टरवर आहे. या दोन्हीही हंगामासाठी मान्सूनचा पाऊस महत्वाचा ठरतो. पण, यंदा मान्सूनने दगा दिला. सर्वच तालुक्यात कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
त्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला तर आता रबीची पेरणी सुरू आहे. अनेक भागात ज्वारीची पेरणी झालेली आहे. त्यातच आता अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. तसेच दुसरीकडे चिंताही लागून राहिलेली आहे.
सातारा शहरात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झालेले. त्यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. तर सकाळी ११ च्या सुमारास भूरभूर पाऊस पडत होता.
मात्र, साडे आकराच्या सुमारास पावसाची जोरदार सर पडली. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सातारकरांना निवारा शोधावा लागला. तर रस्त्याच्या बाजुला बसणाऱ्या विक्रेत्यांची धावपळ उडाली.