माणदेश एक्सप्रेस न्युज/पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल हाती आला असून, गतविजेत्या शिवराज राक्षेला आस्मान दाखवत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार जिंकला आहे. मानाची गदा उंचावत त्याने उपस्थितांना अभिवादन केलं आणि आपला विजय साजरा केला. सिकंदर शेख ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी ही महत्त्वाची होती. वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराज राक्षेचा निभाव लागला नाही. लढत सुरु झाल्यानंतर ५.३७ व्या सेकंदाला झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि चितपट करुन विजय मिळवला.
माती विभागातून संदीप मोटेचा पराभव करुन सिकंदर शेखने अंतिम फेरी गाठली होती. तर गादी विभागातून हर्षद कोकाटेला पराभवाची धूळ चारत शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडकला होता. या दोघांमधली लढत अत्यंत चुरशीची झाली. या लढतीत शिवराज राक्षेचा पराभव करत सिकंदर शेखने मैदान मारलं आणि महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं.