माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील, राजेवाडी येथील सदगुरू कारखाना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चार तास बंद पाडला. कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याने, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
त्यानंतर कारखाना प्रशासन झुकले आणि 100 रुपये वाढीचे पत्र प्रशासन अधिकारी उदय जाधव यांनी दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. परंतु, पैसे शेतकऱ्यांचे खात्यावर वर्ग न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
ऊसाला वाढीव दर द्यावा, सभासद शेतकऱ्याच्या ऊस तोडायला प्राधान्य द्यावे, आटपाडी तालुक्यातील ऊस तोडणीसाठी अग्रक्रम द्यावा, राजेवाडी परिसरात प्रदूषित पाणी सोडले जाते त्याचा बंदोबस्त करावा आदी मागण्यासाठी सोमवारी राजेवाडी कारखान्यावर जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
ऊसाला वाढीव भाव द्यावा, प्रदूषित पाण्याचा बंदोबस्त करावा, संचालकाचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडन्यात आला. त्यानंतर ऊस वाहतूक बंद करून गव्हणीत घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धूमचक्री झाली. सुमारे पाच ते सहा तास कारखाना बंद पाडण्यात आला.
सद्गुरू कारखाना सांगली जिल्ह्यात सर्वात कमी दर देतोय तो वाढवून दिला पाहिजे. सभासद, शेतकऱ्याचा तसेच आटपाडी तालुक्यातील ऊस अग्रक्रमाने तोडला पाहिजे. राजेवाडी परिसरात कारखान्याकडून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्याचा बंदोबस्त करावा. आदी मागण्या आंदोलकांच्या वतीने महेश खराडे यांनी कारखाना प्रशासनाकडे केल्या. त्यानंतर कारखाना प्रशासनाने वाढीव ऊस बिल देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त कार्यकर्ते गव्हणीच्या दिशेने सुसाट पळाले, गेट मोडून आत घुसू लागले, यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांच्या जोरदार धुमचक्री झाली.
गव्हणीकडे जाणारी उसाची वाहने रोखण्यात आली. तीन ते चार तास वाहतूक थांबवली. त्यामुळे कारखाना धुराडे बंद पडले. त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता प्रशासन नमले. त्यांनी आज पासून गळीत होणाऱ्या ऊसाला वाढीव 100 रुपये तर या पूर्वी गाळप झालेल्या ऊसाला वाढीव 50 रुपये देण्याचे कबूल करून तसे लेखी पत्र दिले.
या आंदोलनात आटपाडी तालुका अध्यक्ष विजय माने, सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी बागल, प्रकाश गायकवाड, ऋषिकेश साळुंखे, अजित बोरकर, अजित कोडग, शहाजन शेख, ईश्वर माने, तानाजी सागर, नंदकुमार माने, केशव शिरकांडे, कृष्णा पुजारी, राजेंद्र पाटील, बाबुराव शिंदे, अमित दबडे, तानाजी पारेकर, सुरेश वडुले, शिवराज गायकवाड, मदन जाधव, सिराज तांबोळी, संदीप शिरोटे, सुरेश पाचिब्रे, सय्यद मुलाणी, संजय यादव आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.