सांगली लोकसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे गेला. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली.
मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. अशात विशाल पाटलांवर पक्षाची शिस्त मोडल्याची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
जर कुणी पक्षाची शिस्त मोडून निवडणूक लढणार असेल. भाजपला मदत व्हावी म्हणून मग ती व्यक्ती काम करत असेल. तर ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी कारवाई झाली पाहिजे. शेवटी कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नखशिखांत खोटेपणा आहे आणि भ्रष्टाचार आहे. सत्तेच्या काळात दिल्लीत महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करुन लोकांना त्रास दिला आहे. त्यांना आता भीती वाटत आहे की, मला पण अटक करतील. ते म्हणतात की मला अटक करणार होते अहो तुम्ही गुन्हे केलेत. फोन टॅपिंग केलेत. तुम्ही गुन्हे केले आहेत. मी नाही त्यातली कडी लाव आतली अस कसं चालेल? असा दावाही संजय राऊतांनी केला आहे.