उद्या (१९ एप्रिल) देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात होणार असून महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. उद्यापासून मतदानास सुरूवात होणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर मतदान होईल.
पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठी उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघात 2105 मतदारसंघ, तर रामटेकमध्ये 2405 मतदान केंद्र आहेत.
मुख्य लढती कोणाच्या?
नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीकरून पाठिंबा देण्यात आला आहे.
चंद्रपूरमध्ये 15 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार रिंगणात असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी काँग्रेसकडून आम. प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. गडचिरोलीमध्ये भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे किरसन नामदेव असा सामना रंगणार आहे.
रामटेकची लढत सुद्धा लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत लोकसभेचे उमेदवारी मिळवली आहे. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांची उमेदवारी कट करून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे रिंगणात आहेत. या ठिकाणी माजी मंत्री सुनील केदार व देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी 18 उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. महायुतीचे सुनील मेंढे आणि महाविकास आघाडीचे डॉ प्रशांत पडोळे यांच्यामध्ये थेट लढत होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.