काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली सांगलीत कॉंग्रेसचा मेळावा संपन्न झाला. या वेळी पटोले यांनी मविआच्या उमेदवारीवर काँग्रेसचा नैसर्गिक हक्क असताना तो डावलून उबाठा शिवसेनेच्या वाटय़ाला सांगलीची जागा दिली गेली. यामागे एक मोठे षडय़ंत्र असून, त्याचा योग्य वेळी खुलासा होईलच, पण सद्य:स्थितीत भाजपचा पराभव करायचा या हेतूने आघाडी धर्माचे पालन करून मविआचा उमेदवार विजयी करणे सर्वाची जबाबदारी आहे असेही पटोले यांनी सांगितले.
या वेळी माजी मंत्री थोरात व माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगलीच्या भावना तीव्र आहेत हे मान्य केले; मात्र त्यापेक्षा भाजपला पराभूत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.पाटील यांच्याबाबतचा अहवाल दिल्लीला पाठविला जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पटोले यांनी सांगितले.
सांगलीतील काँग्रेस एकसंघ होती. याला कोणाची तरी दृष्ट लागली आणि ही दृष्ट उतरविल्याशिवाय मी राहणार नाही. ही जागा पक्षाला मिळावी यासाठी आपण अखेपर्यंत लढा दिला. मात्र हा लढा देण्याची वेळ ज्यांच्यामुळे आली ते पक्षाचे वरिष्ठ नेते हे जागावाटपाच्या चर्चेवेळी काय करत होते असा सवाल कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम यांनी मेळाव्यात सर्वासमोर केला. त्यांनी दिलेल्या या घरच्या आहेरामुळे बैठकीस उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांसह हे वरिष्ठ नेतेही काही काळ स्तंभित झाले.
तर काँग्रेसचा मेळावा पार पडल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, हा प्रकार सुरू होताच काँग्रेसचे नेतेही सभास्थळ सोडून निघून गेले होते.