माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत असली तरी मुख्य लढत ही भाजपचे संजयकाका पाटील व अपक्ष विशाल पाटील यांच्यात होत आहे. महाआघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे सध्या बाजूला फेकले गेले आहेत. सुरुवातीला संजयकाका पाटील यांना एकतर्फी वाटणारी निवडणूक सध्या मात्र कठीण पातळीवर आली आहे. कारण, 'आटपाडी तालुक्यातील सर्व नेते एकत्र व कार्यकर्ते,जनता एका बाजूला असे चित्र निर्माण झाले आहे'. दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते मात्र एकमेकांना फोन करून, नेत्यांचा आदेश मानायचा असे सांगत असले तरी, जनता मात्र आपले काही ऐकत नसल्याचे सांगत असल्याने संभ्रंम वाढत आहे.
आटपाडी तालुक्यातील सर्व नेत्यांनी महायुतीचे उमदेवार संजयकाका पाटील यांना जाहीर पाठींबा दिला असला तरी, काँग्रेसचे प्रमुख जयदीप भोसले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम राहिले आहेत. त्यामुळे जेवढे मतदान विशाल पाटील यांना मिळणार तेवढे फायदा जयदीप भोसले यांना होणार आहे. याउलट भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांना मिळणारे मतदान हे नेमके पडळकर गट, अमरसिंह देशमुख गट व शिंदे सेनेचा तानाजीराव पाटील गट यापैकी कुणाचे? यावर पुढील बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत.
संजयकाका पाटील यांनी आमदार अनिलभाऊ बाबर हे ह्यात असताना त्यांच्यावर केलेली जहरी टीका, बाबर गटाचे सुहास बाबर व अमोल बाबर यांनी मनावर घेतली नसली तरी, कार्यकर्ते विसरले नसून, याची भरपाई करण्याच्या तयारीत आहेत. आटपाडी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकी मध्ये संजयकाका पाटील यांनी थेट सहभाग घेत प्रचार केला असल्याने त्याचा मोठा फटका ही शिवसेनेच्या उमेदवार यांना काही ठिकाणी बसला असल्याने तेथील मतदानातून याचा उद्रेक होणार आहे. एकंदरीत तालुयातील महायुतीचे नेते संजयकाका पाटील यांच्या बाजूला व दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते, जनता ही अपक्ष विशाल पाटील यांच्या पाठीशी असल्याने याचा मोठा फटका संजयकाका पाटील यांना बसण्याची शक्यता आहे.