तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका उमा रामानन यांचं दीर्घ आजाराने चेन्नईत निधन झालं आहे. बुधवार १ मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ६९ वर्षांच्या होत्या. उमा रामानन यांचं निधन झाल्याची माहिती त्यांचे पती संगीतकार ए.व्ही रामानन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उमा काही दिवसांपासून आजारी होत्या. १ मे रोजी त्यांची प्रकृती आणखी खालावली. संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं निधन कशामुळे झालं याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
तमिळ चित्रपटसृष्टीत उमा यांचं मोठं योगदान होतं. या लोकप्रिय गायिकेच्या पश्चात तिचे पती ए.व्ही.रामानन आणि त्यांचा मुलगा विघ्नेश रामानन हे आहेत. उमा यांनी तमिळ चित्रपटांमधील अनेक लोकप्रिय गाणी गायली आहे. त्यांच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत उमा यांनी ६ हजारांहून अधिक मैफिलींमध्ये ( लाइव्ह कॉन्सर्ट ) भाग घेतला होता.
'निझलगल’मधील पुंगाथवे थलथिरवाई या गाण्यामुळे त्यांचं नाव घराघरांत लोकप्रिय झालं. ‘ओरु जीवन अलैथाथु’, ‘आगावा वेनिलेव्ह अरंगेत्रा वेलाई’, ‘पूपलम इसाइकुम’, ‘नी पाधी नान पडी कन्ने’ अशी त्यांची बरीच गाणी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांनी १९७७ मध्ये ‘श्री कृष्ण लीला’ मधील गाण्याद्वारे कलाविश्वात पदार्पण केलं होतं.