जिल्ह्यातील पुरबाधीत शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीसाठी 131 कोटी रुपये प्राप्त ; पालकमंत्री जयंत पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यात गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अतिवृष्टीत उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक हेक्टर पर्यंतच्या पीक कर्जास माफी जाहीर करण्यात आली होती. यासाठी आतापर्यंत जिल्ह्याला 131 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे . यातील 80 कोटी रुपयांचा निधी फेब्रुवारी 2020 मध्ये प्राप्त झाला असून आता 15 एप्रिल 2020 रोजी उर्वरित 50 लाख 91 हजाराचा निधी पीक कर्ज माफीसाठी प्राप्त झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारसमोर आर्थिक समस्या असली तरी पूरबाधित कोणीही शेतकरी या कर्जमाफी पासून वंचित राहू नये यासाठी अर्थमंत्री अजित पवार तसेच अर्थ सचिव यांच्याकडे वारंवार या रकमेसाठी पाठपुरावा करून सदरची रक्कम विशेष बाब म्हणून जिल्ह्यासाठी उपलब्ध करून घेण्यात यश आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
गतवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या पूरपरिस्थीतीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या एक हेक्टर पर्यंच्या पीक कर्जास माफी देण्यात आली होती. सदर कर्जमाफीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील पूरबाधीत शेतकऱ्यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील 22 हजार 573 शेतकऱ्यांची व राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांची 5 हजार 873 शेतकऱ्यांची अशी एकूण 28 हजार 446 शेतकऱ्यांचा कर्जमाफी रक्कमेचा मागणी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावास अनुसरुन दिनांक 14 फेब्रुवारी 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार 80 कोटी रुपये इतका निधी प्राप्त झाला होता. हा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पूरबाधीत शेतकरी कर्जदारांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. तसेच दिनांक 27 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये 50 कोटी 91 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला होता. 15 एप्रिल 2020 रोजी प्राप्त झाला आहे. यापैकी 25 कोटी रुपये इतकी रक्कम सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पूरबाधीत कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित 26 कोटी इतकी रक्कम राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांकडे लेखापरिक्षण होत असलेल्या यादीनुसार वर्ग करण्याबाबतीच कार्यवाही सुर आहे. असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free