‘हम नही सुधरेंगे’ आटपाडीकरांची ठाम भुमिका ; शहरातील गर्दी पाहता लॉक डाऊन संपल्यातच जमा
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र शिस्त बाळगायची सवय आटपाडी शहरातील लोकांना नाही. कोरोना मुक्त लॉक डाऊन यशस्वी करण्यासाठी प्रशासन व पोलिसांकडून भूमिका बजावली जात आहे मात्र आटपाडी करांना याचे गांभीर्य दिसत नसल्याचे चित्र आहे. घेरडी ता. सांगोला येथील सापडलेला कोरोनाग्रस्त रुग्ण, तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात वाढलेले रुग्ण याचा विसर आटपाडीकरांना पडलेला दिसत आहे. आटपाडी शहरात जनजागृती करून ‘घरातच रहा सुरक्षित रहा’ हा दिलेला नारा, गेल्या महिन्यापासून पोलिसांनी दिवसभर फिरून नागरिकांना केलेल्या सूचना या साऱ्या गोष्टीला हरताळ फासला गेला असून काही दिवसापासून वर्दळ वाढतच आहे. दुचाकी, चारचाकी वाहनाच्या प्रचंड वर्दळीमुळे शहराचे लॉकडाऊन उठले आहे आणि नेहमीसारखी जनजीवन पूर्वपदावर असल्यासारखे आटपाडीकर एकमेकाचा जीव धोक्यात घालून बिनधास्त फिरत आहे. दुचाकी वरून फिरणाऱ्या युवकांची गर्दी प्रमुख रस्त्यावर वाढत असून शहरातील मंदिरे व व ठीक ठिकाणी अनेकजण गप्पांचे फड रंगवत आहेत. यात महिलाही मागे राहिलेल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोना संकटं गडद होत असताना देशभर विखुरलेले गलाई बांधव आपल्या मूळ गावी परतत असून त्यांची क्वारंनटाईनची सोय केली असली तरी अनेक जण प्रशासनाची नजर चुकवून येत असल्याने आटपाडीकरांसाठी धोक्याची घंटा असून, ‘जपुन जपुन जारे पुढे धोका आहे! अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अनेकवेळा लाठीचा प्रसाद तर अनेकवेळा कायदेशीर कारवाई करून ५ हजार रुपया पर्यंत दंड भरले असले तरी आटपाडकर ‘हम नही सुधरेंगे’ अशा अविर्भावात वावरत आहे. शहरातील सध्याची काही दिवसातील गर्दी पाहता लॉक डाऊन संपल्यातच जमा झाल्याचे चित्र आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस