“अरे बापरे… ताबडतोब… लगेच, मला आता त्यांची भीती वाटतेय…” : संजय राऊत
मुंबई : सामनातील लिखाणाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप नोंदवला असून, त्याबद्दल संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं. पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं पाटील म्हणाले होते. त्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना प्रश्न केला. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले,”अरे बापरे… ताबडतोब… लगेच. मला आता त्यांची भीती वाटतेय… ते पत्र लिहतायेत.. वा वा. सामना वाचतात. सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील. सकारात्मक नजरेतून महाराष्ट्र आणि देशाकडे बघतील. सामना वाचत राहिले, तर त्यांचा विश्वास बसेल की, पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे,” असा टोला राऊत यांनी लगावला.
औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले,” औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. त्याला तीस वर्ष झाली आहेत. आता फक्त कागदावर बदलायचं आहे. महाविकास आघाडीत हा मतभेदाचा विषय नाही. एकत्र बसले, तर मुद्दा निकाली निघेल,” असं राऊत यांनी सांगितलं.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज