“भाजपला आता भविष्यात कधीच अच्छे दिन येणार नाहीत” : महेश तपासे
मुंबई : सांगली महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारत राष्ट्रवादीने विजय मिळवल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आज सांगली महापौरपदाची निवडणूक झाली असून भाजपाचा पराभव करून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी विजयी झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे हे काम नक्कीच उल्लेखनीय आहे, असे महेश तपासे यांनी नमूद केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सातत्याने जयंत पाटील यांच्यावर वेगवेगळी वक्तव्ये करताना दिसत होते परंतु, पुणे पदवीधरची निवडणूक राष्ट्रवादीने जिंकली आणि आजची सांगलीतही राष्ट्रवादीने विजय पताका फडकावली.
या विजयानंतर भाजप पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार झाला असे म्हणायला हरकत नाही, अशा शब्दांत तपासे यांनी निशाणा साधला. भाजपला आता भविष्यात कधीच अच्छे दिन येणार नाही हे महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडी स्वीकारून दाखवून दिले असल्याचेही महेश तपासे पुढे म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस