मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना खोचक टोमणा मारला आहे. “महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्या पक्षात देखील एक नेता म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरा नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही. त्यामुळे आधी त्या सगळ्यांनी गोंधळातून बाहेर यावं. आणि नंतर स्वबळ वगैरे काय आहे त्यावर निर्णय घ्यावा”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना कोणत्याही प्रकारे निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचे सूतोवाच केले. “उद्धव ठाकरेंनी काल राज्यातल्या जनतेला आणि शिवसैनिकांना जी दिशा दिली, त्यानुसार शिवसेना कोणत्याही लढाईसाठी कायम तयार आहे. बळावर वा स्वबळावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर”, असं ते म्हणाले आहेत.