करगणी/नंदकुमार कोळी : हिवतड ता. आटपाडी, जि.सांगली येथील शुकनगर भागात आज सकाळी उच्च दाबाच्या विद्युत लाईन ची तार तुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाला आहे. तर श्रीकांत गोविंद माने या शेतकऱ्याच्या दोन शेळ्या यामध्ये दगावल्या.
तसेच या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे मीटर जाळले आहेत. हिवतड ग्रामपंचायत यांची पाणी पुरवठा करणारी मीटरपेटी मधील इलेक्ट्रिक साहित्य सुद्धा जाळले आहे. ज्या ठिकाणी उच्च दाबाची विद्युत वाहिनी आहे त्या त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तारेचे आच्छादन असणे अपेक्षित आहे परंतु या ठिकाणी अशी कोणतीच उपाययोजना नसल्यामुळे हा अपघात झाला.
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु श्रीकांत गोविंद माने या शेतकऱ्याच्या अंदाजे २० हजार रुपये किमंतीच्या दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे या भागातील लोकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तसेच नुकसान झालेल्या इलेक्ट्रिक साहित्याचे व मीटरचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.