करमाळा : कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करून लोकसभा व विधानसभा लढविणारे करमाळ्यातील आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांची प्रॉपर्टी बँकेकडे कशासाठी गहाण ठेवली? असा सवाल करून दीड हजार शेतकऱ्यांची बँकांमध्ये पत खराब झाली आहे. याची नैतिक जबाबदारी स्विकारून संजय शिंदे यांनी आत्मक्लेश करून आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीचे नेते अतुल खूपसे पाटील यांनी केली.
यावेळी पुढे पुढे बोलताना ते म्हणाले की, उजनीचे पाणी वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या विरोधात आवाज उठविला, कारखानदार असलेल्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या नावे पैसे काढले म्हणून आवाज उठविला, शेतकऱ्यांना शिवा देणाऱ्या खा. दानवेंच्या च्या दारात आवाज उठविला, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मुख्यमंत्र्यांच्या दारापासून ते पंतप्रधानांच्या दारापर्यंत गेलो, उसाच्या बिलासाठी सहकारमंत्र्यांच्या दारात लढलो हे सर्व गुन्हे शेतकऱ्यांसाठी केले आहेत. त्यामुळे मी मान्य करतो की मी गुन्हेगार आहे. आणि माझ्या स्टंटबाजी ने शेतकर्यांना न्याय मिळत असेल तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी शेतकर्यांच्या न्यायासाठी अशी स्टंटबाजी करत राहणार. तो माझा शेतकऱ्यांसाठी चा नैतिक अधिकार आहे. आणि तो लोकशाही दिला आहे.
मात्र तुम्ही विठ्ठल कॉर्पोरेशनच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विश्वासघात कशासाठी केला..? याचे उत्तर द्या. शेतकरी झोपेत असताना त्यांच्या डोक्यात कशासाठी दगड घातला..? हे सर्वांना सांगा शिवाय आपण सांगितले की शेतकर्यांना एफआरपीपेक्षा २५० कोटी रुपये जादा दिले. म्हणजे कारखाना शिलकीत आहे हे सर्वश्रुत असताना आपण शेतकऱ्यांच्या नावावर २२ कोटी कशासाठी काढले याचे उत्तर देखील जनतेला द्या असे सांगून पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांच्या घरी नोटीसा आल्या असत्या तर शेतकऱ्यांनी तुम्हाला ‘कात्रज’चा घाट दाखविला असता.त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेला बोजा व बँकांची खराब झालेली पत याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आत्मक्लेष करावा व आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी खुपसे पाटील यांनी केली.