मुंबई : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे त्यावर आपली भूमिका काय आहे? असे विचारले असता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचे सरकार येऊ नये यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग जाणीवपूर्वक केला गेला. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे चालविणे हे आमचे सगळ्यांचे पहिले प्राधान्य आहे. प्रत्येक प्रदेशाध्यक्ष आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे ते कामच आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून तसाच अर्थ अभिप्रेत आहे. पण निवडणुकांना सामोरे जाताना आम्ही एकटेच स्वतंत्रपणे गेलो तर आम्हाला किती जागा मिळतील याचाही विचार केला पाहिजे.
आम्ही नागपूरला आघाडी केली. म्हणून तेथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतानाही आम्ही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या जागा जिंकू शकलो. या जागा अनेक वर्षे भाजपकडे होत्या. तेथे आमची आघाडीच कामाला आली. त्यामुळे महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत ज्या ठिकाणी अशा पद्धतीची आघाडी करून भाजपला पराभूत करावे लागेल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. आताही अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणुका लढवताना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखावी लागेल. आगामी निवडणुकीत जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे म्हटल्यास गैर ते काय?, असा सवालही त्यांनी केला.