महाराष्ट्र : गेले अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाबाबत अधिवेशन कालावधीमध्ये शासनाची भूमिका सभागृहात मांडण्याबाबतच्या सूचना दोन्ही सभागृहातील सभापती व अध्यक्ष यांनी दिल्या होत्या. याबाबत परिवहनमंत्री ॲड. अनिल परब, यांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन करत आज दोन्ही सभागृहात निवेदन केले आहे. तसेच कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
त्याचबरोबर, परब यांनी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता १२ टक्क्यावरून २८% करण्यात आला, घरभाडे भत्ता ७ %, १४ % २१ % वरुन ८%, १६ % आणि २४% टक्के करण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सेवाकालावधीनुसार रुपये ५०००, रुपये ४००० व रुपये २५०० अशी वाढ करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये साधारणत: रुपये ७००० ते ९००० रुपये वाढ झाली आहे व महामंडळावर दरमहा रुपये ६३ कोटीपेक्षा जास्त भार पडला आहे. ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळच आहे. त्यांच्या नोकरीची हमी आणि त्यांचा पगार महिन्याच्या १० तारखेच्या आत देण्याची राज्य सरकारने हमी घेतली असल्याची माहिती मंत्री, ॲड. परब यांनी सभागृहाला दिली आहे.