आरसीबीचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीने विराट कोहलीच्या फलंदाजीच्या क्रमावर भाष्य केले आहे. जेव्हापासून फाफ डु प्लेसिसला आरसीबीचा कर्णधार बनवण्यात आले आहे, तेव्हापासून संघात ओपनिंग जोडीची चर्चा जोरात सुरू आहे. आता डॅनियल व्हिटोरीने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, माझ्या मते आरसीबीकडे ओपनिंगसाठी कोहली हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, त्याच्या सोबतीला इतर कोणता फलंदाज असेल याने काही फरक पडत नाही.
व्हिटोरी पुढे म्हणाला, ‘आरसीबी संघाच्या ओपनिंग जोडीची दरवर्षी बरीच चर्चा होते. पण विराट कोहली आरसीबीसाठी आयपीएलच्या १५ व्या हंगामात सलामीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. मला वाटते की पहिल्या ६ षटकांमध्ये त्याची फटकेबाजी अधिक प्रभावी ठरेल. पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा करण्याचे कोहलीला स्वातंत्र्य असेल, असे त्याने मत व्यक्त केले.
डेथ ओव्हर्समध्येही विराटचा स्ट्राइक रेट सर्वाधिक आहे. कतो. तो असा खेळाडू आहे की एक ते चार कोणत्याही क्रमाने फलंदाजी करू शकतो. परंतु संघाच्या सध्याच्या गरजेनुसार ओपनिंगचा क्रम सर्वोत्तम असेल, असेही व्हिटोरीने म्हटले आहे.
यापूर्वी, माजी क्रिकेटपटू वसीम जाफर आणि सुप्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी विराट कोहलीच्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल मत व्यक्त मांडले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार एबी डिव्हिलियर्सच्या अनुपस्थितीत मधल्या फळीला मजबूत ठेवण्यासाठी विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे गरजेचे आहे. आरसीबीसाठी मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकसारखे फलंदाज असूनही त्यांनी विराटने तिस-या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी असे म्हटले होते.
आरसीबीचा नवीन कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२२ चा हंगाम खेळणार आहे. त्याच्या निवडीवर माजी कर्णधार विराटने प्रतिक्रिया दिली होती. आरसीबीच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीसाठी फाफ डू प्लेसिस सर्वात योग्य खेळाडू आहेत. त्याचे नेतृत्व संघासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला होता.