मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर ईडीची कारवाई झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली जात आहे. यामध्ये शरद पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, आदित्य ठाकरे अशा अनेक नेत्यांनी भाजपावर टीका केली आहे.
त्यात संजय राऊत यांनी, “शिवसंवाद यात्रेला मिळत असलेल्या मोठ्या प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे”, असे म्हटले आहे. शिवसंवाद यात्रेसाठी संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. तिथे बोलताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “काल सकाळपासून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाल्याबरोबर दुपारी ईडीने कारवाई सुरू केली आणि लोकांचे लक्ष तिकडे वळवायला सुरुवात केली. मालमत्ता जप्त करण्याआधी त्यांना बोलवायला हवे होते. या कारवाईचे भाजपाकडून समर्थन केले जात आहे. ही हुकुमशाहीची नांदी आहे”, असेही मत संजय राऊत यांनी मांडले. “यांच्या कारवायांमुळे सरकार अस्थिर होत नाही. उलट ज्या काही फटी होत्या, त्या बुजल्या गेल्या. यामुळे तीन पक्ष इतके एकत्र आले, की आता हे तुटणे शक्य नाही. एक दिवस यांना स्मशानात जावे लागेल. यांची हाडे राजकीय स्मशानात रचली गेली आहेत. जे करतायत, त्यांनी हे लक्षात ठेवावे की यांची लाकडे रचली गेली आहेत. त्यांना राजकारणातून कायमचे हे राम म्हणावे लागेल”, अशा शब्दांत राऊतांनी टीका केली.