आटपाडी: मध्य महाराष्ट्र आणि भोवतालच्या प्रदेशात निर्माण झालेल्या चक्रिय वातस्थितीमुळे काल राज्यभर ढगाळ वातावरण होते. तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत आज पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या ठिकाणी आज हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणांसह सातारा आणि सांगली येथे म्हणजेच उद्या पावसाच्या हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पाउस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली येथे शुक्रवारीही पाउस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेले काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पाउस पडत असल्याने मुंबईसह कोकणपट्टय़ातील भागांतही ढगाळ वातावरण आहे. काल उन्हाने मुंबईकडे पाठ फिरवली होती. उपनगर आणि शहर भागात दिवसभर मळभ दाटले होते. परिणामी उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळाला. किमान तापमानात परंतु, दोन अंशांची वाढ झाली होती. त्यामुळे अंदमानजवळ घोंघावणाऱ्या चक्रीवादळाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रावर होणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.