नवी दिल्ली: देशभरात आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यापासून इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. कालच्या दर वाढीनंतर आज पुन्हा सरकारी इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलमध्ये प्रति लिटर मागे ८० पैशांची तर, मुंबईत इंधन दरात ८५ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे, या इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत टोला लगावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे काल लोकसभेत म्हणाल्या कि , “सध्याची परिस्थिती पाहता केवळ निवडणुकाच इंधन दरवाढ रोखू शकतात. पेट्रोल, डिझेल, एलपीजीचे भाव वाढू नयेत, म्हणून दर महिन्याला निवडणुका घ्या,”असे म्हणत, सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
तसेच,जोपर्यंत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या नव्हत्या, तोपर्यंत इंधनाचे दर स्थिर होते. परंतु, निकाल लागताच दरवाढ सुरू झाल्याची जोरदार टीका विरोधकांकडून केंद्र सरकारवर होत आहे. त्याचप्रमाणे काल गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत.