केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. याला रोखण्यासाठी भाजपविरोधी पक्षांनी एकत्रीत यावे, याप्रश्नी चर्चा करुन पुढचे पाउल उचलावे, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विनाभाजप शासित मुख्यमंत्र्यांना पत्राच्या माध्यमातून केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे की, जेव्हा निवडणुका जवळ येतात त्यावेळीच केंद्रीय तपास यंत्रणेचे कामकाज सुरु होते. भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहेत. त्यांना रोखायला हवे. मी न्याययंत्रणेचा सन्मान करते. मात्र सध्या काही पक्षपाती राजकीय पक्षाच्या हस्तक्षेपामुळे न्याय मिळत नाही. हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. आपल्या लोकशाहीत न्यायव्यवस्था, माध्यम आणि नागरिक हे महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत.
यातील एका स्तंभालाही धक्का पोहचल्यास संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त होण्याची भीती असल्याचेही त्यांनी पत्रात सांगितले आहे.केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांविरोधात गैरवापर सुरु आहे, मी आग्रह करते की, यावर एकत्रीत येवून चर्चा करणे आवश्यक आहे. देशातील सर्व भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येवून दडपशाहीविरोधात लढा देण्याची गरज आहे, असेही आवाहन ममता बॅनर्जी यांनी या पत्रात केले आहे.