नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाला इतिहास आहे फक्त भूगोल राहिलेला नाही, असे जोरदार भाष्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राज्याच्या महाविकास आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसबाबत संजय राऊत यांनी हे मत व्यक्त केले आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या ‘प्राप्तकाल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी संजय राऊत उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
“काँग्रेस पक्षाला इतिहास आहे फक्त भूगोल राहिलेला नाही. काँग्रेसने भूगोल वाढवला पाहिजे. उत्तर प्रदेशातील निकाल पाहता काँग्रेस पक्षाने देशामध्ये ताकद वाढवली तरच २०२४ मध्ये समर्थ पर्याय उभा राहू शकतो,” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
तसेच,“दिल्लीच्या निवडणुका भाजपाला सोप्या नाहीत. फक्त महानगरपालिका नाही, तर लोकसभा निवडणुकाही भाजपासाठी सोप्या नसून,भाजपच्या शाखा झपाट्याने वाढत आहेत. शिवसेनेच्याही शाखा वाढत आहेत. पण, आमच्या शाखेमध्ये समाजसेवा होते, लोकांची कामे होतात, असा खोचक शब्दांत जोरदार टोलाही राऊत यांनी भाजपाचे नाव न घेता लगावला आहे.