नवी दिल्ली: देशात गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वारंवार वाढत आहेत. या दरवाढीवरून विरोधी पक्ष केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहे. आता तृणमुल काँग्रेसचे नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही इंधनाच्या दरवाढीवरून मोदी सरकारवर जोरात निशाणा साधला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या काळातील आठवणी सांगताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, “अटलबिहारी वाजयेपी सत्तेत असताना आपल्याकडे लोकशाही होती, परंतु पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आपल्याकडे हुकूमशाही आहे.” बंगालमध्ये एप्रिल महिन्यात पोट निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर प्रचार करताना सिन्हा यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
शत्रुघ्न सिन्हा हे तृणमूलच्या तिकिटावर १२ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमधील आसनसोलमधून पोटनिवडणूक लढवत आहेत. ते म्हणाले कि,“त्यांना गर्व आणि अहंकार आहे. त्या पदावर असल्यामुळे तुम्हाला हवे ते करा, अशी त्यांची भूमिका आहे. नऊ दिवसांत आठ वेळा इंधनाचे दर वाढले. हा अहंकार आहे. नऊ दिवसांत डिझेल आणि पेट्रोलचे दर आठ वेळा वाढल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का?”, असा जोरदार प्रश्न करत पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.