नवी दिल्ली : कोरोना झाल्यामुळे यूपीएससीच्या 2021-22 मधील मुख्य परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देताना विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या याचिकेवर फेरविचार करून दोन आठवड्यांत अंतिम निर्णय घेण्याची सुचना न्यायालयाने यूपीएससीला दिले आहेत. कोरोना संसर्गामुळे मुख्य परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्या, त्याबाबत दोन आठवड्यांत पुनर्विचार करा, अशी सुचना न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे मुख्य परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी अजून संधी द्यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी 24 मार्च 2022 रोजीच्या संसदीय समितीच्या अहवालाचा संदर्भ दिला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यूपीएससीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे.
केंद्राने न्यायालयात आधीच आपली भूमिका मांडली आहे. जे उमेदवार कोणत्याही कारणामुळे UPSC मुख्य परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करण्याची तरतूद नाही, असे केंद्राने म्हटले होते. यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेत, जेव्हा विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे परीक्षेला बसू शकले नाहीत, परंतु कोणत्याही परिस्थितीत आयोगाने उमेदवारांसाठी अतिरिक्त संधी दिलेली नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले.
उमेदवार कोविडमुळे यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला बसू शकले नव्हते. त्या विद्यार्थ्यांच्या निवेदनावर पुनर्विचार करण्याचे निर्देशही खंडपीठाने प्रशासनाला दिले आहेत. याचवेळी न्यायालयाने यूपीएससीच्या उमेदवारांनी दाखल केलेल्या मागण्या निकाली काढल्या आहेत. उमेदवारांच्या वतीने वकील शशांक सिंह यांनी न्यायालयात बाजू मांडली आहे. कोरोनामुळे ज्या उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा शेवटचा प्रयत्न चुकला, ते दुसऱ्या संधीचे हक्कदार आहेत. यूपीएससीकडे अशा संभाव्य परिस्थितीसाठी कोणतेही धोरण नाही, असा युक्तिवाद सिंह यांनी केला. त्याची न्यायालयाने दखल घेतली आहे.