म्हसवड/अहमद मुल्ला : मुंबई-बंगळूर कॉरिडॉरच्या धर्तीवर केंद्र सरकारची म्हसवड एमआयडीसी इतरत्र कोठेही हलवू देणार नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील काही धनदांडग्यांनी एमआयडीसी भागात सामान्य शेतकऱ्यांच्या कवडीमोल भावाने खरेदी केलेल्या जमिनीसाठी एमआयडीसीच्या आडून बेरोजगारांच्या प्रश्नावरून जनतेचा कळवळा आणून एमआयडीसी बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे; पण त्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असून, म्हसवड शहरातील सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधेबाबत भेडसावणाऱ्या प्रश्नासाठी यांनी कधी समिती स्थापन केली नाही. मग आताच त्यांना निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या प्रश्नासाठी उसने अवसान आणले जात असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष विजय घट यांनी पत्रकार परिषदेत केला.
म्हसवड येथे होणारी मुंबई बंगळूर कॉरिडॉर एमआयडीसी ही कोठेही हलवली जाणार नसून ही एमआयडीसी म्हसवड येथेच होणार आहे. म्हसवड, मासाळवाडी व धुळदेव येथील सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी या भागातील बड्या-बड्या नेत्यांसह धनदांडग्यांनी कवडीमोल भावाने खरेदी करून याच धनदांडग्यांनी या एमआयडीसीबाबत चुकीची माहिती पसरवली आहे. त्यांना शेतकऱ्यांबाबत व बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत कसलेही देणेघेणे नसून त्यांना त्यांच्या जमिनीच पडलेय, म्हणून हा कळवळा त्यांनी आणला आहे.
शेतकऱ्यांच्या नावाने कळवळा आणणाऱ्या या महाभागांची त्यांच्या खरेदी केलेल्या जमिनीच्या सर्व्हे नंबरसहित नावाची यादी लवकरच देऊ. म्हसवड व परिसरातील नागरिकांना गेल्या पाच वर्षांपासून मूलभूत सुविधेसंबंधित समस्या भेडसावत आहेत. पालिका हद्दीतील नागरिकांना परिवर्तन पॅनेलच्या सत्तेच्या काळात तर आठ ते दहा दिवसांतून एकदाच पिण्याचे पाणी दिले जातेय, तेही दूषित, विना फिल्टरचे. हेच पाणी नागरिक पीत आहेत. हे पाणी पिल्याने आरोग्यासंबंधी समस्या निर्माण झाली आहे. शहरातील परिवर्तन पॅनेलने केलेली रस्त्याची कामे, स्वच्छतेसंबंधातील कामात मोठा भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशाचा दुरुपयोग केल्याचा आरोपही त्यांनी केला.