मुंबई : आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, 'ज्यांनी ठाकरे कुटुंबाला त्रास दिला, खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून आता तुम्ही बसला. त्यांच्याकडून स्वागत करुन घेता आणि वरुन आमच्याबद्दल प्रेम दाखवता हे खरे आहे की खोटे जनताच ठरवेल, असा हल्लाबोल ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केला.
तसेच, ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर उदय सामंत म्हणाले, 'उद्धव साहेबांच्या पत्रकार परिषदेवर मी काही बोलणे योग्य नाही. त्यांनी त्यांचे मत मांडले. आम्ही शिंदेसोबत का गेलो ते जनतेला सांगितले आहे. आम्ही शिवसेनेसोबत आहोत, एकनाथ शिंदेसाहेब देखील शिवसेनेतच असून बाळासाहेब ठाकरेंचा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला आहे असे ते सांगतात.
याशिवाय, धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्याबाबतीत कुठलाच प्रयत्न शिंदे यांनी केला नाही. मी १५ दिवस शिंदेसोबत होतो. या दिवसांमध्ये कुठेही चिन्ह घ्यायची चर्चा त्यांनी केली नाही. तसेच दोन्ही गटांमधील मतभेद दुर करण्यासाठी कालावधी होता त्यावेळी मी प्रयत्न केला. मात्र, आता त्यासाठी शिंदे साहेबांशी, पंतप्रधानांशी बोलायला हवे. आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपच्या लोकांना देखील विश्वासात घ्यायला पाहिजे असेही सामंत यावेळी म्हणाले.