मुंबई: गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच, पुढील चार दिवस राज्यभरात हिच स्थिती कायम राहणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
याशिवाय, 4-5 दिवसात मुंबई, ठाण्यासह, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असून मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही पावसासाठी ही अनुकूल स्थिती होती. मात्र राज्यातील काहीच भागात पाऊस झाला. उर्वरित भागात अजूनही अपेक्षित पाऊस पडला नाही. या आठवड्यात मात्र राज्यातील पावसाची परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालन्यामध्ये मंगळवारी तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भात गडचिरोली येथे मंगळवारी रेड अलर्ट आहे. चंद्रपूर येथे मंगळवारी ऑरेंज अलर्ट आहे तर नागपूर, अकोला, अमरावती येथे बुधवारी तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे.