अहमदनगर - राहुरी शहरातील आझाद चौक येथील सासूचा मृत्यू झाल्याचे समजताच अवघ्या अर्ध्या तासात सुनेचा देखील हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यु झाला. सासू सूनेवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मालनबाई शेजूळ असे सासुचे तर मिराबाई शेजूळ असे सुनेचे नाव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील आझाद चौक परिसरात शेजूळ कुटूंब वास्तव्यास आहे. त्या कुटुंबातील सासू-मालनबाई पांडुरंग शेजूळ यांना ७ जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान अचानक त्रास होऊ लागला. घरातील नातेवाईकांनी त्यांना शहरातील एका रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रात्री एक वाजे दरम्यान हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
काही वेळातच सुन- मिराबाई भाऊसाहेब शेजूळ, वय ५५ वर्षे यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना देखील त्याच रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि दिड वाजे दरम्यान म्हणजे सासू मयत झाल्याच्या अवघ्या अर्ध्या तासाने सुनेचाही मृत्यू झाला.
दरम्यान, मृत्यू नंतर सासू मालनबाई व सून मिराबाई एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.