मुंबई: मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. बहुमत चाचणी दरम्यानही या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. पण शिवसेनेतील १५ आमदारांनी शेवटपर्यंत बंडखोरी न करता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. आता या १५ आमदारांना उद्धव ठाकरे यांनी भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल निष्ठावान शिवसेनेच्या आमदारांना धन्यवाद व्यक्त केले आहे.
तसेच या पत्रात उद्धव ठाकरे म्हणाले कि,शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहेत. निष्ठा व अस्मितेची महती शिवसेना प्रमुखांनी आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिले. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिले. आपल्या या भूमिकेनेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला. व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देवो, असे या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, आज सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांच्या एकमेकांवरच्या याचिकांवर निकाल जाहीर होणार आहे. निकालाचा निर्णय येण्यापूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत राहीलेल्या १५ निष्ठावान शिवसेना आमदारांना भावनिक पत्र लिहीले आहे.