पुणे : आषाढी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील विठुरायाचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी नव्या शिंदे सरकारवर टीका केली. 'बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता, त्याला दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावण्यासारखे आहे', अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शिंदे सरकार अस्थिर आहे, अजित दादा म्हणतोय ते खरे आहे. लोक सूरत, गुवाहाटी, गोवा फिरून आले. भारतदर्शन करून आले. बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना हाताळत होते. हे दुर्दैवी आहे'.
तसेच, 'मुख्यमंत्र्यांना पुढच्या २५ वर्षासाठी शुभेच्छा. शिवसेनेला मित्रपक्ष म्हणून साथ दिली आणि देत राहणार. बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता, अर्थात उद्धव ठाकरेंना दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावण्यासारखे आहे. सरकार एका विमानातून उतरून दुसऱ्या विमानात बसत आहे. फाइव्ह स्टारमध्ये अडीच हजाराची दाढी, कटिंग करतेय. त्यामुळे यात सर्वसामान्य, कष्टकरी शेतकरी मात्र भरडला जातोय. त्यामुळे यांना सर्वसामान्यांचे काही घेणे देणे नाही. त्यामुळे हे असंवेदनशील शिंदे सरकार आहे'.