श्रीनगर: अमरनाथ गुंफेजवळ ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर बचाव कार्य वेगाने सुरू आहे. आयटीबीपीचे जवानही शनिवारपासून मदतकार्य करत आहेत. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच ४० जण बेपत्ता असून पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, दक्षिण काश्मीरमध्ये असलेल्या पवित्र अमरनाथ गुंफेजवळ मुसळधार पावसाच्या दरम्यान, सायंकाळी ५.३० वाजता ढगफुटी झाली. त्यानंतर डोंगराच्या उतारावरून पाण्याचा आणि गाळाचा दाट प्रवाह दरीकडे वाहू लागला. त्यामुळे गुंफेच्या बाहेर बेस कॅम्पमध्ये बांधलेले २५ तंबू आणि तीन कम्युनिटी किचन उद्ध्वस्त झाले.
लष्कर, बीएसएफ (BSF), आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि इतर अधिकारी मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर प्रशासनाने बचाव कार्यासाठी प्रगत हलकी हेलिकॉप्टरही तैनात केली आहेत. ६ पथके मदत आणि बचाव कार्य करत आहेत.
दरम्यान, अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अप्पर होली केव्ह, लोअर होली केव्ह आणि पंजतरणी येथील बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत