मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या आपला पक्ष वाढवण्यासाठी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यभरात फिरतायत. बंडखोरांवर आणि भाजपवरही उद्धव ठाकरे टीका करत आहेत. तसेच, शिवसेना आपल्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र घेत आहे. अशातच आता, "सत्ता असताना फिरले असते तर, असे गठ्ठे करण्याची वेळ आली नसती" अशी बोचरी टीका प्रविण भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
दरम्यान, शिवसेना आपल्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाशी एकनिष्ठ असल्याबाबत पत्र लिहून घेतले आहे. याबाबत बोलाताना प्रविण दरेकर म्हणाले कि, पुन्हा नव्याने शपथ पत्र घेऊन पक्ष घट्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, पण सत्ता असताना फिरले असते तर असे गठ्ठे करण्याची वेळ आली नसती असा जोरदार टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
तसेच ते पुढे म्हणाले कि, “ज्या पद्धतीने हे सरकार अस्तित्वात आले तेव्हापासून जनता खुश आहे, शिंदे-फडणवीस सरकरच्यामागे बाप्पा उभा राहील अन देवांनाही कळतं कुणाच्या मागे आशीर्वाद द्यावा असा जोरदार टोला प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस ही जोडी राज्याला दिशा देईल. महाराष्ट्र् आणि मतदारसंघाच्या भविष्यासाठी ही जोडी टिकली पाहिजे असेही दरेकर यांनी वक्तव्य केले.