कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतील पत्रकार परिषदेत आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपला किती खाती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, मनसेला एक मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, 'मनसेला मंत्रिमंडळात घेण्याचा काही संबंधच नाही. मनसे हा निवडणुकीत आमच्यासोबत नसल्याने त्यांना मंत्रीपद देण्याचा प्रश्नच येत नाही. जर तसा विचार होत असेल, तर त्याचा विरोध करू'.
तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता काही दिवसातच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला देखील १ मंत्री पद मिळेल, अशी आशा केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
दरम्यान, रामदास आठवले हे कल्याणात एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.