मुंबई: राज्यात काल (मंगळवार) पासून मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. हवामान विभागाने मुंबईत ९ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. देशातील सर्वच राज्यांत मान्सून सक्रीय झाला आहे. आज सकाळी मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, पण नवी मुंबईत सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे.
याशिवाय, कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून सतत पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच एनडीआरएफच्या देन तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत.
कोयना धरण क्षेत्रात सुद्धा पावसाने जोर धरल्याने या भागातील कोयना धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सद्या झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
तसेच, सातारा जिल्ह्यच्या पश्चिम भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तापोळा येथे तीन नद्यांचा संगम आहे. कोयना,सोळशी,कांदाटी या तिन्ही नद्या या ठिकाणी मिळतात या भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे दरे, गाढवली आणि इतर गावातील लोकांना आता जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.