मुंबई: शिवसेना आणि शिंदे गटाच्या भवितव्याचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या पर्श्वभूमीवर काल शिंदे गटातील नेत्यांनी हा निकाल आमच्याच बाजूने लागेल असे वक्तव्य केले होते, या वक्तव्याला आज संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
यावेळी संजय राऊत म्हणाले, राज्यात बेकायदेशीर सरकार लादले आहे, त्यासाठी विधीमंडळाचा, राजभवनाचा वापर केला. याविरोधात शिवसेना कोर्टात पोहोचली आहे. या देशात लोकशाही आहे की नाही. याचा फैसला या निमित्ताने लागेल संपूर्ण देश सर्वाच्च न्यायालयाकडे अपेक्षेने पाहत आहे. पण सर्वाच्च न्यायालय आमच्या खिशात आहे, निकाल आमच्या बाजूने लागेल अशी वक्तव्य समोरच्या बाजुने केली जात आहेत, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे, असे भाष्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले.
तसेच, सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल आमचा विश्वास आहे, संविधानानुसार हे सरकार नाही. देशात लोकशाही आहे की नाही की त्याची ही हत्या झाली याचा निकाल येईल. काही लोक म्हणतात निकाल आमच्या बाजूने लागेल, न्यायालय त्यांचा गुलाम आहे का, असा प्रश्नही राऊत यांनी केला.